मेहकर बुलेटिन एक्स
प्रेस न्युज
बुलढाणा दि, १७_१२-२०२५
आरोग्य व्यवस्थेचे तीन तेरा आदिवासी भागातील आरोग्य केंद्र चक्क दोन शिपायांच्या भरवशावर
रुग्णालय परिसरात लाखोंचा वैध औषधसाठा जाळल्याचा धक्कादायक प्रकार
या गंभीर प्रकाराला जबाबदार कोण आरोग्यमंत्र्यांनी उत्तर देतील का
राज्यातील आरोग्य व्यवस्थेची लक्तरे वेशीला टांगणाऱ्या घटना सातत्याने समोर येत असताना, बुलढाणा जिल्ह्यातील आदिवासी व दुर्गम भागातील एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. संग्रामपूर तालुक्यातील वसाली प्राथमिक आरोग्य केंद्र सध्या डॉक्टर व आवश्यक कर्मचाऱ्यांविना असून, चक्क दोन परिचारक (शिपाई) या आरोग्य केंद्राची धुरा सांभाळत असल्याचे वास्तव समोर आले आहे.
विशेष म्हणजे या आरोग्य केंद्राच्या परिसरात लाखो रुपये किमतीचा वैध औषधसाठा जाळण्यात आल्याचा गंभीर प्रकारही उघड झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे या औषधांची मुदत संपलेली नसतानाही ती औषधे कोणी व कोणाच्या आदेशाने जाळली, याबाबत अद्याप कोणतीही स्पष्टता नाही.
वसाली प्राथमिक आरोग्य केंद्राचे उद्घाटन होऊन एक वर्षही पूर्ण झालेले नसताना, डॉक्टर व कर्मचारी अनुपस्थित असल्याने आदिवासी नागरिकांना आवश्यक आरोग्यसेवा मिळत नसल्याचे चित्र आहे. रुग्णांच्या तपासण्या व प्राथमिक उपचार दोन शिपायांकडूनच केले जात असल्याचे निदर्शनास आले आहे.
प्रशासनाची भूमिका जाणून घेण्यासाठी संपर्क साधला असता, आरोग्य केंद्रावर कोणताही वैद्यकीय अधिकारी किंवा वरिष्ठ कर्मचारी उपस्थित नसल्याचे समोर आले. त्यामुळे केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या जिल्ह्यातच आदिवासी नागरिकांच्या जीवाशी आरोग्य विभाग खेळत आहे का, असा गंभीर सवाल उपस्थित केला जात आहे.
या प्रकरणाची तातडीने चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.



Post a Comment
0 Comments